समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी आपल्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते अमरसिंह यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. यादव कुटुंबात सुरू असलेल्या वादाला अमरसिंहच जबाबदार असल्याचा थेट आरोप त्यांनी केली आहे. पक्ष फुटण्यापूर्वीच मुलायमसिंह यादव यांनी पक्षाला सावरण्याची गरज व्यक्त करत अखिलेश यादव यांची त्यांनी बाजूही घेतली आहे. अखिलेश यांच्या नेतृत्वाखालीच समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशात पुन्हा सत्ता मिळू शकते असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
पक्षाला दुभंगण्यापासून वाचवण्यासाठी मी मुलायमसिंहाना विनंती करतो. अखिलेश यादव हे पक्षाचे अत्यंत योग्य नेतृत्व करत आहेत. ते फक्त कोणाचे ऐकत नाही. मुलायमसिंह यांनी एकदा पक्षांतर्गत मतदान घेऊन अमरसिंहांबाबत मत आजमावून पाहावे, असे म्हणत खुषमुस्कऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
मुलायमसिंह यादव हे महान नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा विस्तार झाला आहे. त्यांच्याशिवाय समाजवादी पक्ष होऊच शकत नाही. परंतु एका व्यक्तीने पक्षात फूट पाडण्याचे ठरवल्यानंतरही मुलायमसिंह यांनी मौन धारण केले आहे अशी खंत व्यक्त केली. अमरसिंह यांचे नाव न घेता ते म्हणाले, एका व्यक्तीने नोव्हेंबर महिन्यातच टविट करत अखिलेश हे मुख्यमंत्री पदावर दीर्घकाळ राहणार नसल्याचे म्हटले होते. म्हणजे अनेक दिवसांपासून हा कट रचण्यात आला होता. परंतु मुलायमसिंहांना ही गोष्ट समजली नाही.