कायदेशीर बाबींच्या पूर्ततेचा भाग येथील तांबरम हवाईतळावरून उड्डाण केल्यानंतर भारतीय हवाई दलाचे एएन-३२ विमान बेपत्ता झाले असून, ४८ तासांनंतरही ते सापडलेले नाही. हवाई दल, नौदल व तटरक्षक दल यांनी बराच शोध घेऊनही विमान सापडले नाही. आता या प्रकरणी भारतीय हवाई दलाने पोलिसात विमान बेपत्ता झाल्याची रीतसर तक्रार नोंदवली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, की एएन-३२ विमान बेपत्ता झाल्याची तक्रार आम्हाला मिळाली असून ते वाहतूक विमान होते. सेलायूर पोलिसांनी काल रात्री ही तक्रार दाखल करून घेतली आहे. तक्रारीत म्हटल्यानुसार या एएन -३२ विमानात एकूण २९ प्रवासी होते व हे विमान उड्डाणानंतर बेपत्ता झाले आहे. त्यात तामिळनाडूचा एक जण आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान गेल्या वर्षी बेपत्ता झाले होते तेव्हाही अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. नंतर या विमानाचा सांगाडा व मृतदेह तामिळनाडूतील कडलूर येथे सापडले होते. एएन-३२ या विमानाचे शोधकार्य रविवारी लागोपाठ तिसऱ्या दिवशी सुरू होते. हे विमान २२ जुलैला तांबरम हवाईतळावरून पोर्ट ब्लेअरला जाण्यासाठी सकाळी साडेआठ वाजता उडाले, पण नंतर सोळा मिनिटांत त्याचा संपर्क तुटला व बेपत्ता झाले. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी काल चेन्नईत जाऊन संबंधित ठिकाणी दोन तास हवाई पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.