दिवाळीनिमित्त एअर इंडियाने प्रवाशांसाठी स्वस्तात तिकीट उपलब्ध करून देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. दिवाळी धमाका योजने अंतर्गत देशांतर्गत प्रवासासाठी १७७७ रूपयांपर्यंत तिकीट दर कमी करण्यात आले आहेत. ३ ते ७ नोव्हेंबर या काळात आगाऊ आरक्षण करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीच ही सुविधा उपलब्ध असेल. १५ जानेवारी ते १५ एप्रिल २०१६ या कालावधीत प्रवासी या योजनेच्या साह्याने देशात प्रवास करू शकतील, असे कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
देशातील एकूण ५० शहरांमध्ये एअर इंडियाची विमान सेवा उपलब्ध आहे. त्यामध्ये ईशान्य भारतासह, लढाख, अंदमान-निकोबार बेटे यांचाही समावेश होतो. दिवाळी धमाकाच्या माध्यमातून आगाऊ आरक्षण करणारे प्रवासी या सर्व ठिकाणी कुठेही प्रवास करू शकतील.
प्रवासी एअर इंडियाच्या वेबसाईटवरून त्याचबरोबर मोबाईल अॅपच्या साह्याने आरक्षण करू शकणार आहेत. एअर इंडियाच्या बुकिंग ऑफिसमध्येही आरक्षण करता येणार आहे.