अमित शहा यांची घोषणा
केंद्रातील मोदी सरकारने जनतेच्या मनात आशा निर्माण केल्या असून, पुढच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच २०१९ पूर्वी सर्व आश्वासने पूर्ण केली जातील असे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले.
शहा यांनी केंद्र सरकारच्या देशाच्या सर्वागीण विकासावर भर दिल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये जनादेश मिळाल्याचे सांगितले. हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला आत्महत्येनंतरचा वाद किंवा जेएनयू प्रकरणावरून शहा यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. हे मुद्दे उपस्थित करणारे आता कोठेच नाहीत असा टोलाही विरोधकांना लगावला. काँग्रेसने दहा वर्षांच्या राजवटीत तिजोरी रिकामी केली तसेच नोकरशाहीचे खच्चीकरण केल्याचा आरोप शहा यांनी केला. आर्थिक सुधारणा व कल्याणकारी योजना यामध्ये सरकारने संतुलन ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने दोन वर्षांत केलेली विकास कामे जनतेपर्यंत नेण्यासाठी देशभरात २०० ठिकाणी भाजपची ३०
पथके शनिवारपासून जाणार असल्याचे शहा यांनी जाहीर केले. त्यात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.
देशाच्या प्रगतीसाठी सर्वच पक्षांनी अशा विधेयकांना सहकार्य करावे असे आवाहन शहा यांनी केले. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांबाबत विचारले असता, त्याची तारीख निश्चित नाही असे उत्तर शहा यांनी दिले.