गेल्या आठ हजार वर्षांत पृथ्वीच्या तापमानात ०.९ अंशांनी वाढ झाली आहे. विकासाची बदलती प्रारूपे, कार्बनचे वाढते उत्सर्जन, हरितगृह वायूंचे चढे प्रमाण, पर्यावरणस्नेही उपकरणांच्या वापराकडे दुर्लक्ष, अशा अनेक कारणांमुळे गेल्या दीडशे वर्षांत झालेली तापमानवाढही ०.९ अंशच आहे. पण नव्या संशोधनानुसार, प्राचीन शेतकऱ्यांच्या शेतीपद्धती गेल्या आठ हजार वर्षांतील तापमानवाढीस प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. जागतिक तापमानात वाढ होण्यामागे जसा औद्योगिक क्रांतीचा हात आहे, तितकाच तो प्राचीन शेतीचाही आहे, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
प्राचीन शेतीद्वारे पृथ्वीच्या हवामानात कार्बन डायाक्साईड, मिथेन यांसारखे हरितगृह वायू वाढण्यास मदत होत होती. त्यामुळे या कालावधीत तापमानात ०.७३ अंशांनी वाढ झाली. मात्र त्या वेळी असलेल्या मोकळ्या जमिनींमुळे अधिकाधिक सूर्यप्रकाश परावर्तित होत असे आणि त्यामुळे तापमानातील वाढ मर्यादित राहू शकली, असे नव्या संशोधनात म्हटले आहे.
‘औद्योगिक क्रांतीपूर्व मानवी जीवनाचा पृथ्वीच्या वातावरणावरील परिणाम’ या विषयावर संशोधन सुरू आहे. वृक्षतोड आणि सिंचनाचे पृथ्वीच्या तापमानावर झालेले परिणाम आणि त्यानुसार त्या त्या वेळच्या जागतिक हवामानाची विविध प्रारूपे या संशोधकांनी आकडेमोडीद्वारे तयार केली आहेत.
 प्राचीन काळात झालेली प्रचंड वृक्षतोड आणि तांदळाच्या पिकासाठी वाढते सिंचन यामुळे कार्बन डायाक्साईड आणि मिथेन वायूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे अनुमान या शास्त्रज्ञांनी काढले आहे.