चीनद्वारे अरुणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांचे नामांतरण केल्यानंतर भारताने त्यावर दिलेली प्रतिक्रिया चीनला चांगलीच झोंबल्याचे दिसते आहे. भारताने दिलेली प्रतिक्रिया ही हास्यास्पद आहे, असे चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. भारताने चीनविरोधात दलाई लामा कार्ड वापरल्यास त्याची भारताला जबर किंमत मोजावी लागेल, अशी धमकी चीनने दिली आहे. दलाई लामा म्हणतात म्हणून अरुणाचल प्रदेश आमचे आहे असे भारत म्हणू शकत नाही, असेही चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने प्रकाशित केलेल्या एका लेखात म्हटले आहे. अरूणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांना प्रमाणित नावे देण्याच्या चीनच्या खेळीनंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतला होता. अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे सरकारने ठणकावून सांगितले होते. परराष्ट्र मंत्रालयाने गुरूवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली होती. नाव बदलून बेकायदेशीरपणे कब्जा केलेला प्रदेश कायदेशीर होऊ शकत नाही. अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागवे यांनी सांगितले होते. चीनचे हे पाऊल मूर्खपणाचे आहे, असे भारताने म्हटले होते. भारताच्या या रोखठोक उत्तराने चीनचा तीळपापड झाला आहे. भारताने दिलेली प्रतिक्रिया हास्यास्पद आहे, असे चीनने म्हटले आहे. दलाई लामा कार्ड वापरला तर भारताला महागात पडेल, असे चीनच्या सरकारी वृत्तपत्रातील लेखात म्हटले आहे. तत्पूर्वी, धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल भेटीने खवळलेल्या चीनने अरुणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांना अधिकृत ‘प्रमाणित’ नावे जाहीर केल्याचे सांगत भारतावर कुरघोडीचा प्रयत्न केला होता. चीनच्या नागरी कामकाज मंत्रालयाच्या हवाल्याने चिनी प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले होते. चिनी, तिबेटी आणि रोमन वर्णाक्षरांद्वारे अरुणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांचे १४ एप्रिलला नामकरण करण्यात आले होते. व्योग्यानिलग, मिला री, कोइंदोरबो री, मनकुका, बुमो ला व नमकापूब री अशी ही नावे आहेत. चीनने अरुणाचल प्रदेशातील या ठिकाणांचे नामांतरण केल्यानंतर अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, अशा शब्दांत भारताने चीनला ठणकावले होते.