आम आदमी पक्षाच्या नेत्यांमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेला वादाचा धुरळा शांत होण्याची चिन्हे दिसत आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते योगेंद्र यादव आणि राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्यातील पत्रयुध्दाला आता पूर्णविराम मिळणार अशीच काहीशी चिन्हे दिसत आहेत. योगेंद्र यादव यांच्या पत्रांना विचारात घेत अरविंद केजरीवालांनी यादव यांनी केलेल्या सूचना या अत्यंत महत्त्वाच्या व पक्ष हिताच्याच असून, पक्ष त्या सूचनांवर काम करणार असल्याचे ट्विटरवर म्हटले आहे. योगेंद्र यादव माझे जीवलग मित्र असल्याचे देखील केजरीवाल यांनी ट्विट केले आहे.

पक्षातून सध्या बाहेर गेलेल्या नेत्या साजिया इल्मी यांना देखील परत पक्षात आणण्यासाठीची आवश्यक पावले उचलण्यात येणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले.

योगेंद्र यादव यांनी त्यांच्या पत्रांमध्ये ‘आप’च्या घटनेनुसार पक्षाची वाटचाल सुरू नसल्याची आणि इतर पक्षांप्रमाणे ‘सुप्रिमो’ पध्दत पक्षामध्ये बळावत चालली असल्याची टीका केली होती. अरविंद केजरीवाल हे असामान्य नेते असल्याचे देखील यादव यांनी त्यांच्या पत्रव्यवहारामध्ये म्हटले होते.