आसाममधील हातसिंगिमारी उपविभागात पंचायत निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर शुक्रवारी सकाळी उडालेल्या चकमकीत आणि सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळीबारात दोन जण ठार, तर ११ जण जखमी झाले आहेत. या परिसरात बेमुदत संचारबंदी जारी करण्यात आली आहे.
मतमोजणी प्रक्रियेला विलंब होत असल्याचा आरोप करून उमेदवारांच्या समर्थकांनी पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला चढविला. मतमोजणी करणारे अधिकारी आणि सुरक्षारक्षकांवर दगडफेक करताच या परिसरातील स्थिती हाताबाहेर गेली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
संतप्त जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला असता त्यामुळे जमाव अधिकच हिंसक बनला. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी रक्षकांना गोळीबार करावा लागला. त्यामध्ये दोन जण जागीच ठार झाले, तर अन्य सात जण गंभीर जखमी झाले. यामध्ये चार सुरक्षारक्षकही जखमी झाले असून, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.