मंत्र्यांच्या व्हिआयपी दौऱयांसाठी विमानाचे उड्डाण लांबवणीवर टाकून प्रवाशांना वेठीस धरल्याप्रकरणाची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने हवाई वाहतूक मंत्रालयाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी, हवाई वाहतूक मंत्रालयाने देखील एअर इंडियाकडून स्पष्टीकरण मागविले आहे. तर, हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रवाशांचा खोळंबा झाल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांची गैरसोय झाल्याची खंत असून हवाई वाहतूक मंत्रालय दिलगिरी व्यक्त करत असल्याचे गजपती राजू यावेळी म्हणाले. यापुढे असा प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे आश्वासान देखील त्यांनी दिले आहे. दरम्यान, पंतप्रधानांना हस्तक्षेप करावा लागण्याइतके हे प्रकरण मोठे नाही पण, पंतप्रधान कार्यालयाने अहवाल देण्याचे निर्देश दिले असल्याने एअर इंडियाकडून झालेल्या घटनेची सविस्तर माहिती येऊ देत. मग, घटनेची सत्यता पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचविणे हे आमचे कर्तव्य असल्याचे गजपती राजू यांनी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री किरण रिजिजू, त्यांचे खासगी सचिव व जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह हे लेहवरुन दिल्लीला येत असताना या तीन मंत्रीमहाशयांना जागा मिळावी यासाठी तिघा प्रवाशांना विमानातून उतरविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तर, देवेंद्र फडणवीस अमेरिका दौऱयासाठी रवाना होत असताना त्यांचे सचिव प्रवीण परदेशी अमेरिकेचा योग्य व्हिसा घरी विसरल्याने विमानाचे उड्डाण तब्बल दीड तास उशीराने झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. व्हिआयपी नेत्यांच्या या थाटामुळे भाजपवर टीका सुरु झाली. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर हवाई वाहतूक मंत्रालयाने एअर इंडियाकडून दोन्ही घटनांबाबतचे स्पष्टीकरण मागविले. त्यानंतर लगेचच पंतप्रधान कार्य़ालयानेही हवाई वाहतूक मंत्रालयाला घडलेल्या घटनांच्या अहवालाची विचारणा केली. एअर इंडियाच्या अहवालाची वाट पाहत असून एअर इंडियाचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेता येईल, असे हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर.एन.चौबे यांनी सांगितले आहे.