बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अटकेत असलेल्या समर्थकांना सोडवण्यासाठी चक्क पोलीस ठाण्यावरच हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री आग्रा येथे हा प्रकार घडला आहे. या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर हल्ला करताना परिसरात असलेल्या पोलिसांची वाहनेही पेटवून दिली. कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थकांना पोलीस ठाण्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला. या सर्वांना सदर बाजार ठाण्यात ठेवण्यात आले होते. फतेहपूर सिक्रीचे आमदार उदयभान सिंह आणि त्यांचे समर्थक आंदोलन करण्यासाठी पोहोचले होते, अशी माहिती आग्रा शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुशील चंद्रभान यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले. हे लोक तिथून निघताच ही घटना घडल्याचे ते म्हणाले.

आंदोलन करत असलेले सर्व लोक हे बजरंग दलाचे कार्यकर्ते होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. येथे सकाळपासूनच गोंधळ सुरू होता. पोलिसांनी ९ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांनी मुस्लिम लोकांना मारहाण केल्याचा आरोप होता. त्याचा विरोध करण्यासाठी काही लोक पोलीस ठाण्यात आले होते. त्यांनी हा गुन्हा रद्द करून अल्पसंख्याक समुदायाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
या आंदोलनादरम्यान वरिष्ठ पोलिस निरीक्षकांबरोबर गैरवर्तन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी पाच लोकांना ताब्यात घेतले. त्या लोकांना सदर बाजार पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले होते.
शनिवारी सांयकाळी पोलीस उपनिरीक्षक संतोष कुमार हे शहागंज ठाण्यातून आपल्या घरी परतत असताना आंदोलकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या आंदोलकांनी सदर बाजार ठाण्यात अटकेत असलेल्या समर्थकांना तुरूंग तोडून घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचा दावा एका पोलीस अधिकाऱ्याने केला.