नेपाळच्या नव्या घटनेविरुद्ध मधेशींनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे भारतीय सीमेवरील महत्त्वाच्या व्यापार केंद्रांवर झालेल्या कोंडीने उद्भवलेल्या इंधन संकटावर उपाय म्हणून आपल्या बंदरांच्या मार्गाने इंधनाची वाहतूक करू देण्याची (ट्रांझिट फॅसिलिटी) तयारी बांगलादेशाने दर्शवली आहे. नेपाळमधील सध्याच्या इंधन संकटाची बांगलादेशाला कल्पना असल्याचे सांगून, इंधन आणि द्रवरूप वायू यांच्या आयातीसाठी आपली मांगला व चितगांव ही बंदरे वाहतुकीसाठी वापरू देण्यास आपला देश तयार असल्याचे बांगलादेशाच्या राजदूत मश्फी शम्स म्हणाल्या. या दोन बंदरांच्या उपलब्धतेबद्दल बांगलादेशने नेपाळला अधिकृतरीत्या कळवले असून, आपले हवाई वाहतुकीचे इंधन बांगलादेशातून आणण्यात नेपाळने स्वारस्य दाखवले असल्याचे शम्स म्हणाल्या, असे वृत्त ‘दि हिमालयन टाइम्स’ने दिले आहे. सीमेवर दोन महिन्यांपासूनच्या कोंडीमुळे नेपाळला सध्या पेट्रोलियम पदार्थ व स्वयंपाकाच्या गॅसच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.