मायानगरी मुंबई, श्रीमंतांची दिल्ली आणि गोड खवय्यांचे कोलकाता ही शहरे स्थलांतरित लोंढय़ांच्या अजेंडय़ावर कायम राहत असली, तरी भारतात राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांबाबत घेण्यात आलेल्या पाहणीमध्ये तंत्रज्ञान पंढरी म्हणून ओळखले जाणारे बंगळुरू शहर अग्रस्थानी आले आहे. जागतिक शहरानुरूप कसोटीवर उतरलेला राहणीमानाचा दर्जा बंगळुरइतका कोणत्याच शहरामध्ये उत्तम नसल्याचा पाहणीचा दावा आहे.
 ‘मर्सर’ या आंतरराष्ट्रीय मानव्य सल्ला संस्थेद्वारे जगभरातील उत्तम शहरांचा अभ्यास करण्यात येतो. या वर्षीच्या पाहणीमध्ये भारतामधील बंगळुरूने जागतिक नकाशावर १३९ वे, तर भारताच्या नकाशावर प्रथम स्थान पटकावले. त्यानंतर यादीमध्ये नवी दिल्ली (१४३), मुंबई (१४६), चेन्नई (१५०) आणि कोलकाता (१५१) या शहरांची वर्णी लागली.
गेल्या काही वर्षांमध्ये बंगळुरूने आपल्या राहणीमानाच्या दर्जात आमूलाग्र सुधारणा केली असून, येथील आंतरराष्ट्रीय शिक्षणसंस्थांबाबत अहवालामध्ये शहराची पाठ थोपटण्यात आली आहे.  व्हिएन्ना या यादीमध्ये अग्रभागी असून झुरिच आणि ऑकलंडचा क्रम त्यानंतरचा आहे.