रोख रक्कम काढण्यावरील निर्बंध उठवण्यात येऊ नयेत, अशी विनंती बँकांनी केंद्र सरकारकडे केली आहे. जोपर्यंत बँकांकडे पुरेशा प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध होत नाही, तोपर्यंत बँक खात्यांमधून रोख रक्कम काढण्यावरील निर्बंध उठवले जाऊ नये, अशी विनंती बँकांकडून करण्यात आली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून बँक खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध आणण्यात आले आहेत. सध्या कोणीही व्यक्ती एटीएममधून दिवसाला २,५०० आणि बँकेतून दर आठवड्याला २४,००० रुपये काढू शकते.

सरकारने लादलेल्या या निर्बंधांवर शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. याबद्दल बँकांकडून चिंता व्यक्त होते आहे. जर सरकारने बँक खात्यातून पैसे काढण्याबद्दलचे निर्बंध हटवले, तर लोक मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढण्यास सुरुवात करतील. त्यामुळे आधीच रोख रक्कम कमी असलेल्या बँकांची स्थिती आणखी बिकट होऊ शकते, असे बँक अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते आहे.

‘बँकाकडे पुरेशा प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध झाल्यावरच बँक खात्यातून पैसे काढण्यावरील निर्बंध हटवले जायला हवेत. जर आताच निर्बंध हटवले गेले, तर लोक मोठया प्रमाणात रोख रक्कम काढण्यासाठी येतील. त्यामुळे मोठे संकट निर्माण होईल,’ असे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. ‘आम्ही सरकारला लिखित स्वरुपात काहीही सांगितलेले नाही. मात्र बँकेतून रोख रक्कम काढण्यावरील निर्बंध कायम असावेत, असे सांगितले आहे,’ अशी माहिती इंडियन बँक असोसिएशनने दिली आहे. इंडियन बँक असोसिएशन खासगी आणि सरकारी बँकेचे प्रतिनिधित्व करते.

३० डिसेंबरपर्यंत फक्त ५० टक्के नव्या नोटाच सामान्यांपर्यत पोहोचतील, अशी माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे तब्बल साडे पंधरा लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या. यातील १४ लाख रुपयांच्या नोटा बँकेत जमा झाल्या आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ८ नोव्हेंबरच्या भाषणात ‘मला फक्त ५० दिवसांचा अवधी द्या. ५० दिवस कळ सोसा,’ असे आवाहन केले होते. ५० दिवसांचा हा कालावधी ३० डिसेंबरला संपतो आहे. त्यामुळे यानंतर पंतप्रधान मोदींनी सांगितल्यानुसार परिस्थिती खरोखरच सुरळीत होणार का, हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.