भविष्यनिर्वाह निधीच्या प्रश्नावरून कपडय़ांच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या आंदोलनाला मंगळवारी बंगळुरूत हिंसक वळण लागल्याने अधिकाऱ्यांनी शहरांत केंद्रीय दल तैनात केले असून प्रतिबंधात्मक आदेशही लागू केले आहेत.
या आंदोलनाचा मोठा फटका जलाहल्ली परिसराला बसला असून तेथे शीघ्र कृती दलाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ध्वजसंचलन केले. हिंसक घटनांप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५० जणांना अटक केली आहे.
जलहल्लीपासून बंगळुरूतील माहिती तंत्रज्ञान मार्गिकेपर्यंत जोरदार निदर्शने करण्यात आली आणि हिंसक घटनाही घडल्या. कर्नाटक राखीव पोलीस दलाच्या १५ तुकडय़ा, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तीन तुकडय़ा, शीघ्र कृती दल आणि शहर सशस्त्र राखीव दलाच्या सहा ते सात तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत, असे उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
या हिंसाचारप्रकरणी आम्ही एकूण १८ गुन्हे नोंदविले आहेत आणि जवळपास ५० जणांना अटक केली आहे, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त हरिशेखरन यांनी सांगितले. दगडफेक करणारे, पोलिसांवर हल्ला करणारे आणि वाहनांना आगी लावणारे समाजकंटक पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या फुटेजमध्ये दिसत असून त्यांना लवकरच अटक करण्यात येणार आहे.