भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या भूमीवरुन अटक करण्यात आली, हा पाकिस्तानचा दावा आयएसआयच्या माजी अधिकाऱ्याने खोडून काढला आहे. आयएसआयमधून लेफ्टनंट जनरल पदावरुन निवृत्त झालेल्या अमजद शोएब यांनी पाकिस्तानच्या दाव्यातील हवाच काढून घेतली आहे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधून नव्हे, तर इराणमधून अटक करण्यात आली होती, अशी कबुली शोएब यांनी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या दाव्यातील फोलपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. कुलभूषण जाधव प्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या स्थगिती दिली आहे. आता न्यायालयातील पुढील सुनावणीत भारताला अमजद शोएब यांच्या विधानाचा वापर करता येऊ शकेल. त्यामुळे जगासमोर पाकिस्तानच्या खोटारडेपणा उघड होईल. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव प्रकरणात भारताला दिलासा दिला आहे. कुलभूषण जाधव भारतीय गुप्तचर संस्था 'रॉ'साठी हेरगिरी करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. भारताने पाकिस्तानचा हा आरोप अमान्य केला आहे. मात्र कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. यानंतर भारताने लगेच आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी १८ मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली. 'कुलभूषण जाधव हेर असल्याचे अद्याप सिद्ध व्हायचे आहे. त्यामुळे अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही', असे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायमूर्ती रॉनी अब्राहम यांनी म्हटले. त्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला. कुलभूषण जाधव वर्षभरापासून पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. 'कुलभूषण इराणमार्गे बलुचिस्तानात शिरले. त्यामुळे त्यांना ३ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली,' असे पाकिस्तानने म्हटले आहे. मात्र भारताने कायम 'कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात आले. कुलभूषण जाधव हे हेर नसून ते नौदलाचे माजी अधिकारी आहेत आणि आता त्यांचा व्यवसाय आहे,' असे म्हणत पाकिस्तानचा दावा खोडून काढला आहे. कुलभूषण प्रकरणाची सुनावणी लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयातील पहिल्या सुनावणीदरम्यान पाकिस्तानला जोरदार झटका बसल्याने या प्रकरणाची सुनावणी सहा आठवड्यांमध्ये पूर्ण करण्यात यावी, यासाठी पाकिस्तानने याचिका दाखल केली आहे. कुलभूषण प्रकरण योग्यपणे न हाताळल्याने नवाज शरीफ यांच्या सरकारवर पाकिस्तानात मोठी टीका झाली आहे.