आपले राजकीय लक्ष्य साध्य करण्यासाठी राजकारण्यांचा सध्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरील वापर वाढला आहे. याचा मुख्य उद्देश सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करावे, त्यांच्यावर आपली वेगळी छाप निर्माण करावी, असा असतो. आता यात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचीही भर पडली आहे. बिहार राज्याला विशेष दर्जा मिळावा, यासाठी नितीशकुमारांनी सुरू केलेल्या अभियानात  त्यांनी माध्यम म्हणून फेसबुकचा वापर सुरू केला. सध्या फेसबुकवर स्वत: नितीशकुमार यांचे तीन अकाऊंट्स तयार करण्यात आले आहेत आणि याचे दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या अकाऊंट्सवर नितीशकुमार यांचे विचार आणि त्यांच्या मतांच्या पोस्ट्स टाकल्या जातात. फेसबुक पेज व्यतिरीक्त नितीशकुमारांचा ब्लॉगही सोशल नेटवर्किंगवर आहे आणि त्याचेही २,२७३ फॉलोअर्स आहेत. तसेच नितीशकुमारांचे विरोधक राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यांना सोशल नेटवर्किंगमध्ये रुची नसूनदेखील त्यांचे फेसबूक पेज त्यांच्या समर्थंकांनी सुरू केले आहे. या पेजचेही ४,१९९ फॉलोअर्स आहेत.