पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे, असे सांगून त्यांच्या छायाचित्रावर चपला मारा, अशी चिथावणी आपल्या समर्थकांना देणारे बिहारचे मंत्री जलील मस्तान यांनी अखेर माफी मागितली आहे. पंतप्रधान मस्तान यांनी नरेंद्र मोदींचा अपमान केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. यावरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही मस्तान यांना झापले होते. त्यानंतर मस्तान यांनी बुधवारी माफी मागितली आहे. माझ्या किंवा समर्थकांकडून केलेल्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो, असे मस्तान यांनी म्हटले आहे. बिहारचे मंत्री मस्तान यांनी मोदींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. तर दुसरीकडे मस्तान यांच्या विधानावर जोरदार आक्षेप घेतला होता. मंत्री जलील मस्तान यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली होती. मस्तान यांनी २२ फेब्रुवारी रोजी पुर्णिया येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय चुकीचा होता, असे वक्तव्य केले होते. त्याचवेळी नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावर चपला मारल्या होत्या. तसेच त्यांना नक्षलवादी म्हणून संबोधले होते. मस्तान यांच्या या कृतीचा भाजपने जोरदार विरोध केला आहे. विधानसभेत बुधवारी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मस्तान यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराजीही व्यक्त केली होती. मस्तान यांनी नरेंद्र मोदींविषयी केलेले वक्तव्य साफ चुकीचे आहे, असे ते म्हणाले होते. दरम्यान, विधानसभेचे कामकाज सुरु होताच या मुद्द्यावरून गदारोळ सुरू झाला. मस्तान यांनी माफी मागावी, तसेच मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली. त्यानंतर सभागृहात गोंधळ घातला. भाजपचे सदस्य वेलमध्ये उतरले. त्यांनी रिपोर्टर टेबल उलटा केला. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. विशेष म्हणजे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक होत सरकारला कोंडीत पकडण्याचा निर्धार केला आहे. बीएस्सी पेपरफुटी, पटना सेक्स रॅकेटच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला आधीच धारेवर धरले आहे. त्यात आता मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे.