उद्यापासून सुरु होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हिंदूू दहशतवादाविषयी गृहमंत्री व लोकसभेचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी महिन्याभरापूर्वी केलेल्या विधानावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेत मनमोहन सिंग सरकारपुढे पेच निर्माण केला आहे. शिंदे यांनी आपले विधान मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा संसदेचे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा बुधवारी भाजपने संसदेत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत तसेच जंतरमंतरवर शिंदे यांच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात दिला.
भाजपचे समाधान होईल, असा तोडगा काढून या प्रकरणाची तीव्रता कमी करण्यासाठी सरकार मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहे.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या पहिल्या अभिभाषणाने संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीचे शेवटचे रेल्वे व सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडण्याची सरकारला संधी मिळणार असल्यामुळे हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे भाजपच्या संतापाची अधिवेशनाला झळ पोहोचू नये, असा प्रयत्न सरकार करीत आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेसच्या सुकाणू समितीमध्येही हिंदूू दहशतवादाच्या मुद्यावरून निर्माण झालेला वाद कसा निस्तरायचा याविषयी चर्चा करण्यात आली.  शिंदे यांच्या वतीने याबाबत एक निवेदन जारी करण्यात येईल, अशी चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात होती.
भाजप-रालोआच्या बुधवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत संसद अधिवेशनादरम्यान हेलिकॉप्टर घोटाळा, महागाई, महिला सुरक्षेसाठी काढलेला अध्यादेश, भूसंपादन विधेयक, दुष्काळ, ओला दुष्काळ, मार्कंडेय काटजू यांचा लेख आदी मुद्यांवर सरकारची कोंडी करण्याची रणनिती आखण्यात आली.
संसदेच्या अधिवेशनात बरेच महत्त्वाचे कामकाज होणार असून हे सत्र व्यवस्थित चालेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सर्व पक्ष मिळून काम करतील, असा विश्वास पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर बोलताना व्यक्त केला. मात्र, सर्वपक्षीय बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी आक्रमक पवित्रा घेत शिंदे यांनी आपले विधान मागे घ्यावे, अशी मागणी केली. भाजपतर्फे दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबिरे भरविली जात नसल्याचे सांगून काँग्रेसच्या वतीने प्रवक्ते संदीप दीक्षित यांनी भाजपला शांत करण्याचा प्रयत्न केला.
भाजपने या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन करून ते म्हणाले की, आधी भाजपमध्ये असलेले काही लोक दहशतवादी कारवायांमध्ये गुंतले असल्याचेही दिसून आले आहे. दरम्यान, संसदेचे कामकाज नीट चालावे म्हणून लोकसभेचे नेते शिंदे आणि संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी स्वराज यांच्याशी चर्चा केली.

भाजपचा इशारा
भाजपने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जंतरमंतर येथे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली जंतरमंतर येथे शिंदे यांच्या विरोधात धरणे धरले. हिंदू दहशतवादावर आपले विधान मागे घेऊन सुशीलकुमार शिंदे माफी मागत नाही तोपर्यंत संसदेचे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे.