राम मंदिराच्या ‘महत्त्वाच्या मुद्दय़ावर’ मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करणे सत्ताधारी भाजपला भाग आहे, असे सांगून विश्व हिंदू परिषदेने अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी सरकारवरील दबाव वाढवला आहे. भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दय़ांमध्ये राम मंदिराचा समावेश होता, याची आठवण विहिंपने करून दिली. राम मंदिर हा भाजपचा प्रमुख मुद्दा आहे. मुख्य प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय कोणताच विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकत नाही. येत्या चार वर्षांत राम मंदिराचा मुद्दा सोडवण्याचा मार्ग या पक्षाला सापडेल याची आम्हाला खात्री असल्याचे संघटनेचे सहसरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी सांगितले.