भाजपचा आरोप, चौकशीची मागणी; केंद्राकडून दखल भाजपच्या दोन केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यावर बारगड येथे करण्यात आलेला हल्ला पोलिसांच्या उपस्थितीत आणि पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या सक्रिय सहभागाने करण्यात आल्याचा आरोप शनिवारी भाजपने केला. राज्यपाल एस. सी. जमीर यांनी या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावे, अशी मागणीही भाजपने केली आहे. ओदिशातील सत्तारूढ बीजेडीला हे मंत्री राज्य अतिथी असल्याची जाणीव होती त्यामुळे त्यांनी हा कट रचला, असे भाजपने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार, साध्वी निरंजन ज्योती आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या ताफ्यावर बीजेडीच्या समर्थकांनी बारगड येथे हल्ला केला होता. ही टोकाची असहिष्णुता असून ओदिशातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे द्योतक आहे, असेही भाजपने म्हटले आहे. ओदिशाचे मंत्री स्नेहांगिनी छुरिया यांच्यासह स्थानिक खासदार आणि आमदारांनी केलेला हा नियोजनपूर्ण हल्ला आहे, असेही भाजपने निवेदनात म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा ओदिशात केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या केंद्रीय नेत्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी सूचना गृहमंत्र्यांनी राज्यपाल जमीर आणि मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून केली आहे. या प्रकाराची दखल घेऊन भविष्यात त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असे राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.