जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० मागे घेण्यास भाजप वचनबद्ध आहे, जेव्हा पक्षाला राज्यात बहुमत मिळेल तेव्हा काश्मीरला या कलमाने दिलेला विशेष दर्जा काढून घेतला जाईल, असे केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सांगितले.
 ते म्हणाले, की कलम ३७० बाबत भाजपची भूमिका बदललेली नाही. मोदी ३६५ या सीएनएन आयबीएनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की ३७० कलमाचा फेरविचार केला जाईल.
मोदी यांच्या परदेश दौऱ्यांबाबत त्यांनी सांगितले, की माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही एवढय़ाच दिवसांत एवढेच दौरे केले होते त्यावर कुणीच दखल घेतली नाही. काँग्रेसने फक्त गरिबांविषयी बाता मारल्या. आम्ही १५ कोटी गरिबांना बँकिंग व्यवस्थेने जोडले. पूर्वी २० टक्के भारतीयांना विमा होता, आता १२ दिवसांत आम्ही ७ कोटी लोकांना विमा दिला आहे, असे त्यांनी सांगितले.