मूळ प्रश्नांपासून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी मोदी सरकार भ्रष्टाचाराचा मुद्दा सातत्याने उपस्थित करीत आहेत, अशी भाजपवर टीका करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर भाजपने पलटवार केला आहे. डॉ. सिंग हे कळसूत्री बाहुली असून ते धादांत खोटे बोलत असल्याची टीका भाजपने केली आहे.
डॉ. सिंग यांच्या दहा वर्षांच्या राजवटीत १२ लाख कोटी रुपयांचे घोटाळे झाले. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर केला नाही एवढेच वक्तव्य करून त्यांना जबाबदारीपासून दूर पळता येणार नाही, असे त्यांच्यावर हल्ला चढविताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले.
स्वत: भ्रष्टाचार करू नये इतकीच पंतप्रधानांची जबाबदारी नाही तर अन्य कोणालाही भ्रष्टाचार करू दिला जाणार नाही याची खबरदारी घेणे हेही पंतप्रधानांचे काम आहे. संपूर्ण यंत्रणेतून भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्याची त्यांची जबाबदारी आहे. डॉ. सिंग यांच्या राजवटीत १२ लाख कोटी रुपयांचे घोटाळे झाले असून काँग्रेसला जबाबदारी झटकता येणार नाही, असेही शहा म्हणाले.