महाराष्ट्र सदनप्रकरणी भाजप खासदार गायकवाड यांचे वक्तव्य ‘मी भगवान गौतम बुद्धांचा शिष्य आहे. मी बुद्धवादी नसतो तर नव्या महाराष्ट्र सदनातील उपाहारगृहात मला नीट वागणूक न देणाऱ्यांच्या कानाखालीच लगावली असती..,’ असे वक्तव्य लातूरचे भाजप खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी शुक्रवारी केले. तसेच दोन कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या निवासी आयुक्तांचा असल्याचे सांगत त्यांनी स्वत:चे हात झटकले. ‘मी खासदार असूनही मला उपाहारगृहामधील कर्मचाऱ्यांनी नीट वागणूक दिली नाही. ते माझ्याशी अरेरावीने बोलले. माझ्या जागेवर दुसरा कोणीही असता तर तो असल्या अपमानानंतर गप्प राहिला नसता. पण बुद्धवादी विचारांचा आहे. मी दररोज ध्यानधारणा करतो. शांततेचे पुरस्कार मला मिळालेत. म्हणून मी गप्प बसलो. नाही तर मी शंभर टक्के त्यांच्या कानाखाली दोन लगावले असते,’ असे सांगून ते म्हणाले, ‘नाही तरी महाराष्ट्र सदनाचा इतिहासच मारझोडीचाच आहे. दर्जा नीट नसल्याने शिवसेनेच्या खासदारांनी तिथल्या कर्मचाऱ्यांच्या तोंडात चपाती कोंबल्या होत्या. पण मी भाजप खासदार असतानाही तसे काही केले नाही.’ डॉ. गायकवाड हे मुलीला व जावयाला घेऊन नव्या महाराष्ट्रात सदनात आले असता मंगळवारी रात्री हा प्रकार घडला होता. बसण्यास जागा न दिल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून त्यांनी खासदार असूनही नीट वागणूक न दिल्याची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. तसेच कारवाई न केल्यास दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यचा (अॅट्रॉसिटीज अॅक्ट) वापर करण्याचा इशारा दिला होता. तेव्हा महाराष्ट्राच्या निवासी आयुक्त कार्यालयाने गायकवाडांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन उपाहारगृह कंत्राटदाराला दहा हजारांचा दंड केला आणि संबंधित दोन कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा आदेश दिला. या सगळ्या प्रकारांत दोघांच्या पोटावर पाय आल्यानंतर सामाजिक माध्यमांमध्ये टीका होऊ लागली. मात्र, गायकवाडांनी आपल्या कृतीचे ठाम समर्थन केले. ‘मी जबाबदार कसा?’ छोटय़ा प्रकारावरून दोघांची नोकरी गेल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘मला वाईट वागणूक मिळाल्याने मी तक्रार केली. तिथे खासदारकीचा संबंध नाही. शिवाय त्या दोघांना नोकरीवरून काढण्याची मागणी मी केली नव्हती. त्या कारवाईचा निर्णय सरकारचा आहे. त्याची जबाबदारी त्यांची आहे. माझा काहीही संबंध नाही. मला जबाबदार धरण्याचे कारण नाही.’