दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर बुधवारी लोकसभेत भाजपच्या सदस्यांनी समविषम योजनेवरून जोरदार हल्ला चढविला. महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यास विलंब लावून केजरीवाल देशाच्या राजधानीत अराजकतेचे वातावरण पसरवीत असल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांनी केला.
सभागृहात शून्य प्रहराला सदर प्रश्न उपस्थित करताना रमेश बिधुरी यांनी केजरीवाल राजकारण करण्यासाठी नाटक करीत असल्याचा आरोप केला. दिल्लीतील वाढते प्रदूषण आणि वाहतुकीची होणारी कोंडी यांच्याशी त्यांना काहीही देणेघेणे नाही, असेही बिधुरी म्हणाले. मेट्रोचा चौथा टप्पा जानेवारी महिन्यात सुरू होणे अपेक्षित होते त्यालाही केजरीवाल विलंब लावत आहेत, असा आरोपही करण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकारने दिल्लीतील जनतेच्या हितासाठी एकतर्फी निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.