लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे निवडणूकनीतितज्ज्ञ प्रशांत किशोर हे नंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या तंबूत गेले. आता ते उत्तर प्रदेशात राहुल गांधी यांचा चेहरा चमकविण्याच्या प्रयत्नात आहेत. ते भाजपच्या गोटातून बाहेर पडल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार हा मोठाच प्रश्न होता. तो सोडविला भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी. त्यांनी आसामातील विधानसभा निवडणूक प्रचारासाठी आणले रजत सेठी या तिशीतल्या तरुणाला. आयआयटी आणि हावर्डमध्ये शिकलेल्या रजत सेठीकडे त्यांनी प्रचाराची रणनीती आखण्याची, राबविण्याची कामगिरी सोपविली. रजत यांच्या मदतीला होती शुभ्रस्था. ती प्रशांत किशोर यांची आधीची सहकारी. या दोघांनी आसाममध्ये भाजपसाठी विजय खेचून आणला. ते स्वत मात्र याचे बरेचसे श्रेय देतात ते आसामातील आदिवासी भागात नि:स्वार्थीपणे काम केलेल्या संघाच्या स्वयंसेवकांना. प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयाच्या श्रेयाचे बाशिंग स्वतच्या डोक्यावर बांधण्याचा जो प्रकार केला, त्यामुळे त्यांना भाजपच्या छावणीतून बाहेर पडावे लागले होते. तो इतिहास रजत सेठी याच्या चांगलाच लक्षात आहे म्हणावे लागेल. पण प्रशांत यांच्याहून रजतचे वेगळेपण असे, की तो भाडोत्री सैनिक नाही. भाजपचा कट्टर समर्थक आहे. आयाराम-गयारामांना फटका वाहत्या गंगेत हात धुऊन घेणे हा राजकारणातील एक महत्त्वाचा पाठ. प. बंगालमधील मतदारांनी मात्र हा पाठ गिरवणाऱ्या आयाराम-गयारामांना चांगलाच धडा शिकवल्याचे या वेळी दिसून आले. काँग्रेस आणि अन्य पक्ष सोडून तृणमूलच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्यांना अनेक उमेदवारांना मतदारांनी धूळ चारली. महिला दुर्बलीकरण! आसाममधील निवडणुकीने महिलांवर काहीसा अन्यायच केला. काँग्रेसने १६, तर भाजपने सहा, एआययूडीएफने सहा, तर बीपीएफने दोन महिलांना उमेदवारी दिली होती. महिला मतदारांनीही भरभरून मतदान केले. महिलांचे मतदानाचे प्रमाण ८४.८१ टक्के एवढे होते. आणि तरीही विजयश्री मोजक्याच महिलांना पावली. काँग्रेसच्या अवघ्या तीन महिला उमेदवार निवडून आल्या, तर भाजपच्या केवळ दोन. बीपीएफच्या मात्र दोन्ही उमेदवार विजयी झाल्या. गेल्या वेळी तेथे १४ महिला आमदार होत्या. आत्मपरीक्षणाचे राजकारण प. बंगालमधील पराभव डाव्यांच्या जिव्हारी लागावा असाच आहे. बंगालमध्ये माकपने काँग्रेसबाबत जे अनाक्रमणाचे तंत्र वापरले त्यामुळेच तेथे डाव्यांचा पराभव झाला असे निवेदनच भाकपचे सरचिटणीस एस. सुधाकर रेड्डी यांनी जारी केले आहे. या पराभवामुळे एकंदरच डाव्या आघाडीचे बळ घटल्याचे त्यांचे म्हणणे आहे.