पाटणा येथील रॅलीत लालूप्रसाद यांचा आरोप

शक्तिप्रदर्शनासाठी रविवारी पाटणा येथे आयोजित केलेल्या ‘भाजप भगाओ, देश बचाओ’ रॅलीत राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील सरकार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. केंद्रातील भाजप सरकार विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी लालूप्रसाद यादव यांनी केला. तसेच, संयुक्त जनता दलाच्या नेत्यांचे सुरुवातीला मतभेद असतानाही आपणच नितीश कुमार यांना बिहारचे मुख्यमंत्री बनवल्याचा दावाही त्यांनी केला. विरोधी पक्षांच्या उच्चपदस्थ नेत्यांना एकत्र आणण्यासाठी लालूप्रसाद यांनी केलेल्या या प्रयत्नाला मोठा प्रतिसाद मिळाला.

देश सध्या धोकादायक परिस्थितीतून जात आहे. घटनेचे पालन करण्याऐवजी, वारंवार धमक्या देऊन विरोधी पक्षांचे देशातून उच्चाटन करू इच्छिणाऱ्या दोघांच्या इच्छा अमलात आणल्या जात आहेत, असा आरोप लालूप्रसाद यांनी केला. विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांचा उदय होण्याचे श्रेय आपल्यालाच असल्याचा दावा त्यांनी केला. हृदयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतरही आपण जद (यू)च्या उमेदवारांसाठी राज्यभर प्रचार केला आणि त्यांना जिंकून येण्यास मदत केली असे ते म्हणाले. केंद्र सरकार देशातील युवकांना लुटत असल्याचा आरोप करताना लालूप्रसाद म्हणाले, की देशातील युवक रोजगारासाठी आस लावून असताना, २ कोटी रोजगारांचे आश्वासन देणारे सरकार त्याला २०२२ सालचे स्वप्न विकत आहे.

पाटण्यात रविवारी झालेल्या या मेळाव्यात गुलाम नबी आझाद, ममता बॅनर्जी, शरद यादव यांच्यासारख्या नेत्यांनी हजर राहून राजदला पाठिंबा दर्शवला.