गोमांस खाण्यावरून आपण केलेल्या वक्तव्याचा माध्यमांकडून विपर्यास करण्यात आल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. दुसरीकडे भाजपनेही रिजिजू यांच्या विधानाचा पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस श्रीकांत शर्मा म्हणाले, रिजिजू यांनी जे मत मांडले ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे.
मी गोमांस खातो, कोणी मला रोखू शकते का? – किरण रिजिजूंचे नक्वींना उत्तर
मी गोमांस खातो आणि ते खाण्यापासून मला कोणीही रोखू शकते का, असा प्रश्न रिजिजू यांनी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावेळी विचारला होता. मी अरुणाचल प्रदेशमधून येतो आणि गोमांस खातो. ते खाण्यापासून मला कोणी रोखू शकते का? आपण लोकशाही देशात राहतो. त्यामुळे प्रत्येकजण आपापले मत मांडतो. काही लोकांची विधाने इतरांना आवडत नाहीत. मात्र, आपल्याला प्रत्येकाच्या मताचा आणि तेथील लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले होते.
गोमांस खाण्यावरून आपण दिलेल्या उत्तराचा माध्यमांनी विपर्यास केल्याचे त्यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. ते म्हणाले, गोमांस खातो म्हणून जेव्हा मला पाकिस्तानात जाणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याला उत्तर देताना मी म्हणालो, भारत धर्मनिरपेक्ष देश असून, कोणाच्या खाण्याच्या सवयी बदलता येत नाहीत. पण हिंदूबहुल राज्यांमध्ये हिंदूंच्या भावनांचा आदर केला गेला पाहिजे. त्याचवेळी इतर समाज बहुसंख्य असलेल्या राज्यांमध्येही त्या त्या समाजाचे अधिकार जपले गेले पाहिजेत.