सीबीएसईचे निर्देश; अपघातास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार शाळेतील लहान मुलांच्या सुरक्षिततेत वाढ होण्यासाठी शालेय बसमध्ये आता जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेग नियंत्रक बसविण्यात येणार आहेत. याबाबत सीबीएसईकडून सुधारित मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश येथे मागील महिन्यात शाळेच्या बसला अपघात होण्याची दुर्घटना घडली होती. शालेय बसला वारंवार होत असलेल्या अपघातांना लक्षात घेत मानव संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत निर्देश दिले आहेत, असे सरकारी अधिकारी सूत्रांनी सांगितले. शालेय बसच्या खिडकीवर तारेची जाळी बसविण्यात यावी. शाळेच्या बसचा वेग ४० किमी प्रति तास करावा आणि त्यासाठी बसमध्ये वेग नियंत्रक बसविण्यात यावा. सीसीटीव्ही कॅमेरा आणि जीपीएस प्रणाली या वाहनामध्ये बंधनकारक करण्यात यावी आणि ही उपकरणे कायम चालू स्थितीत असावीत, असे सीबीएसईच्या परिपत्रकात म्हटले आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी एक वाहतूक व्यवस्थापक आणि प्रशिक्षित महिला सेवकाची नियुक्ती करावी. शालेय बसमध्ये एक मोबाइल फोन ठेवण्यात यावा. त्याचा वापर आपत्कालीन स्थितीमध्ये विद्यार्थ्यांना करता येईल. तसेच विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा आणि चालकाबाबतची प्रतिक्रिया द्यावी, असे यामध्ये म्हटले आहे. मागील महिन्यात उत्तर प्रदेश येथील इथाह येथे शाळेच्या बसची लॉरीला धडक होऊन अपघात झाला होता. यामध्ये १२ लहान मुलांचा मृत्यू झाला होता, तसेच ३५ मुले गंभीर जखमी झाली होती. ..अन्यथा मान्यता रद्द शालेय बसला झालेल्या कोणत्याही चुकीसाठी व्यवस्थापन आणि शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार ठरविण्यात येतील. तसेच त्यांची मान्यताही रद्द करण्यात येऊ शकते. शालेय बसमध्ये घंटा आणि भोंगा (सायरन) बसविण्यात यावा. प्रत्येक बसमध्ये शाळा प्रशासनाने स्वेच्छेने कमीत कमी एक पालक उपस्थित राहील याची व्यवस्था करावी. त्यामुळे चालक आणि बसमधील इतर कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास मदत होईल, असे परिपत्रकामध्ये म्हटले आहे.