जम्मू काश्मीरमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. अखनूर येथे शनिवारी पहाटे चारच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने भारतावर उखळी तोफांचा मारा सुरू केला. अजूनही गोळीबार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या ५६ तासांत चार वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे चवताळलेल्या पाकिस्तानने मागील ५६ तासांत चार वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले होते. यात अनेक दहशतवाद्यांना भारतीय सैन्यदलाच्या जवानांनी कंठस्नान घातले होते. गुरूवारी रात्रीही भारतीय सीमारेषेवर सुमारे चार तास गोळीबार केला होता.
सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताने सीमारेषेवरील गावे त्वरीत रिकामी केली होती. सीमावर्ती भागातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. भारतीय लष्कराने सुटीवर असलेल्या जवानांना माघारी बोलावले आहे.