तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री ई. पलानीसामी यांनी दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील समिती या प्रकरणी चौकशी करेल. त्याचबरोबर पनीरसेल्वम यांचा गटही अण्णा द्रमूकमध्ये विलीन करण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे. जयललिता यांच्या चेन्नईतील पोएस गार्डन निवासस्थानाचे स्मारकात रूपांतर करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

यापूर्वी मद्रास हायकोर्टमध्ये एक याचिका दाखल करून जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्याची मागणी करण्यात आली होती. मियाजान नावाच्या एका व्यक्तीने ही याचिका दाखल केली होती. जयललिता यांचा मृतदेह बाहेर काढून पुन्हा एकदा शवविच्छेदन करून मृत्यूमागचे खरे कारण समोर आणले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती.

दरम्यान, दि. ५ डिसेंबर रोजी चेन्नईच्या अपोलो रूग्णालयात जयललिता यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पक्षात दोन गट पडले होते. एका गटाने त्यांच्या मृत्यूवर शंका व्यक्त केली होती. जयललितांच्या मृत्यूनंतर सर्वांत प्रथम पन्नीरसेल्वम यांचे निकटवर्तीय पांड्यन बंधूंनी शशिकला आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप केले होते. जयललिता

जयललितांच्या मृत्यूनंतर अण्णा द्रमूक पक्षात मोठी उलथापालथ झाली होती. पक्षात दोन गट पडले होते. पक्षाची धुरा हाती घेतलेल्या शशिकला यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीप्रकरणी तुरूंगात जावे लागले. इतकंच नव्हे तर शशिकला यांचे भाचे दिनाकरन यांनाही कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागला.