एनडीएकडून धक्कातंत्र वापरत रामनाथ कोविंद यांचे नाव राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आले आहे. मात्र एनडीएचा हा निर्णय एकतर्फी असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. भाजपने आम्हाला हा निर्णय घेताना विश्वासात घेतले नाही, अशी टीकाही आझाद यांनी केली आहे. भाजपने राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी, कोअर कमिटी स्थापन केली होती. या कमिटीच्या तिन्ही सदस्यांनी, माझ्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. आमच्यासोबत झालेल्या बैठकीत कोणतेही नाव कोअर कमिटीने आम्हाला सांगितले नाही. मग राष्ट्रपतीपद उमेदवाराबाबत चर्चा झाली असे कसे म्हणता येईल. त्यामुळे या सगळ्याला राष्ट्रपतीपद निवडणुकीच्या नावाची चर्चा कसे काय म्हणायचे? असाही प्रश्न, आझाद यांनी विचारला आहे. सरकारने सर्वसहमतीने  निर्णय घेतलेला नाही, असेही आझाद यांनी म्हटले आहे.

काँग्रेसतर्फे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. मात्र आम्ही आमच्यासोबत असलेल्या पक्षांना सोबत घेऊन सर्वसहमतीने निर्णय करू, तसेच विरोधी पक्षातर्फे कोण उमेदवार असेल याचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी २२ जून रोजी जाहीर करतील अशी माहितीही गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांना दिली आहे. मीरा कुमार यांचे नाव सध्या काँग्रेसच्या गोटात प्रचंड चर्चेत आहे. त्या पाचवेळा खासदार झाल्या आहेत. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबू जगजीव राम यांच्या त्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला काँग्रेस पसंती मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारीच भाजपने रामनाथ विंद यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी निश्चित केले आहे. मात्र हा निर्णय घेताना आम्हाला सरकारने गृहीत धरले अशीही टीका, गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.

आजच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेऊन, रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर केले. या नावाला एनडीएच्या शिवसेना वगळता सगळ्या घटकपक्षांनी सहमती दर्शवली आहे.फक्त मतांचे राजकारण करण्यासाठी कोविंद यांचे नाव जाहीर करण्यात आले असेल तर आम्ही सरकारसोबत नाही. मात्र सगळ्या घटकांचे कल्याण असेल तर आम्ही सरकारसोबत आहोत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दुर्बल घटकांसाठी रामनाथ कोविंद यांनी सातत्याने कार्य केले आहे. ते राष्ट्रपती झाल्यास, ते समाजातल्या दुर्बल घटकांचा बुलंद आवाज होतील, अशा आशायचे ट्विटही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कोविंद यांच्या नाव जाहीर होण्याच्या निर्णयानंतर केले आहे.