देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे कार्यकर्ते आणि भाजपचे माजी नेते रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी शपथ घेतली. कोविंद यांनी आपल्या पहिल्याच भाषणात संघ परिवाराला पसंत पडतील अशा विचारांचा उल्लेख केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. कोविंद यांनी भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानववादाचा उल्लेख केला. हाच मुद्दा उपस्थित करत काँग्रेसने कोविंद यांच्यावर टीका केली आहे. कोविंद यांनी आपल्या पहिल्याच भाषणात देशाचा आणि गांधींचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. कोविंद यांनी आपल्या भाषणात पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू किंवा अन्य काँग्रेस नेत्यांचा उल्लेख न केल्यामुळे काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना काँग्रेस नेते गुलामनबी आझाद म्हणाले, पंडित दिनदयाल उपाध्याय यांची महात्मा गांधींशी तुलना आणि जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख न करणे हा देशाचा अपमान आहे. हा महात्मा गांधी आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांचाही अपमान आहे. या गोष्टींचा भाषणात उल्लेख नसायला पाहिजे होता. आम्हाला अपेक्षा होती की, आता ते देशाचे राष्ट्रपती आहेत. भाजपचे नव्हे, राष्ट्रपती सर्वांचे असतात. पण हे दुर्दैव आहे की, देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचा उल्लेख करण्यात आला नाही. नेहरू एका स्वातंत्र्य सैनिकाचे पूत्र होते. त्यांची मुलगी, नातूने देशासाठी जीव दिला आहे. मोतीलाल नेहरूंपासून राजीव गांधींपर्यंत त्यांनी कोणाचाच उल्लेख केला नाही. हे सर्व जाणूनबुजून केल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यानंतर रामनाथ कोविंद आपल्या भाषणात म्हणाले होते की, आपल्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी प्रयत्न केले होते. सरदार पटेल यांनी संपूर्ण देश एक केला. आपल्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना प्रजासत्ताकाचे महत्व जाणून दिले. वेगाने विकसित होणारी आपली अर्थव्यवस्था आहे. या वेळी सर्वांना संधी देणाऱ्या समाजाची निर्मिती करणे आवश्यक आहे. महात्मा गांधी आणि दीनदयाल उपाध्याय यांनी ज्यापद्धतीने समाजाची कल्पना केली होती. त्यापद्धतीने समाज व्हावा. असा भारत सर्वांना समान संधी देईल. तसेच सुरूवातील कोविंद यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद, राधाकृष्णन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी यांच्या नावाचा उल्लेख केला होता.