नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पीककर्जावरील व्याज सरकारने माफ  केले आहे. एकूण ६६०.५ कोटी रुपयांचे व्याज सरकारने माफ केले आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. ज्या शेतकऱ्यांनी सहकारी बॅंकेकडून अल्पमुदतीचे कर्ज घेतले होते त्यावर व्याज लागणार नसल्याचे मंत्रिमंडळाने म्हटले आहे. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहे.

नोटाबंदीनंतर सर्वाधिक जास्त फटका हा मजूर आणि शेतकरी वर्गाला बसला. त्यामुळेच सरकारने दोन महिन्याचे व्याज न वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच सरकारने नाबार्डला ४०० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी नोटाबंदीच्या काळात अल्पमुदत पीककर्जावर व्याज भरले आहेत त्यांची व्याजाची रक्कम परत केली जाणार असल्याचेही कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी म्हटले आहे. ५०० आणि १००० च्या नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांना पैसे भरण्यास त्रास सहन करावा लागला. रबी पीकांसाठी शेतकऱ्यांना कर्ज उचलावे लागले. त्या कर्जावरील दोन महिन्याचे व्याज पूर्णपणे माफ करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.

क्योटो प्रोटोकॉलच्या हरित वायूच्या उत्सर्जन कराराच्या मुदतवाढीस मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले आहे.  तसेच अनिसाबाद येथे ११.३५ एकर जागा विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. यापुढे आयआयएममध्ये पदविका ऐवजी पदवी प्रदान केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. आयआयएममधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा ऐवजी डिग्री मिळणार आहे. प्रगती मैदान येथे सांस्कृतिक केंद्रासाठी २,२५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.