यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यटनाला जास्त महत्त्व देण्यात आले असून युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केलेल्या नऊ ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली आहे. त्यात पर्यटकांसाठी पार्किंग, माहिती केंद्रे, लँडस्केप (हिरवळयुक्त सुशोभित भूभाग), प्रसाधनगृहे, विकलांगांसाठी अनुकूल सुविधा यांचा समावेश आहे. युनेस्कोने एकूण २५ ठिकाणे जागतिक सांस्कृतिक वारसा ठिकाणे म्हणून जाहीर केली असून तेथे ज्या सुविधा दिल्या जातात त्यात कमतरता आहेत त्या भरून काढल्या जातील. या योजनेत पहिल्यांदा नऊ ठिकाणी सुविधा देण्याचे त्यांनी जाहीर केले. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.या जागतिक वारसा स्थळांमध्ये गोव्यातील चर्च व कॉन्व्हेंट्स, कर्नाटकातील हंपी, मुंबईतील एलेफंटा गुंफा, कुंबळ गड व राजस्थानातील इतर डोंगरी किल्ले, गुजरातमधील पाटण भागातील राणी की वाव, लडाखमधील लेह राजवाडा, उत्तर प्रदेशातील वाराणसी, पंजाबमधील जालियनवाला बाग व हैदराबाद येथील कुतुबशाही स्मारके यांचा त्यात समावेश आहे. आतापर्यंत ४३ देशांच्या पर्यटकांना आगमन होताच व्हिसा मिळण्याची सोय होती आता ती सुविधा विस्तारून १५० देशांना लागू करण्यात आली आहे. युनेस्कोने एकूण ३२ ठिकाणांना जागतिक वारसा ठिकाणे जाहीर केले असून त्यातील २५ ही सांस्कृतिक महत्त्वाची ठिकाणे आहेत तर ७ नैसर्गिक ठेवा असलेली ठिकाणे आहेत. एसी निल्सनने केलेल्या सर्वेक्षणात एलेफंटा गुंफा हे लोकप्रिय पर्यटन ठिकाण नाही तर शिर्डी प्रथम स्थानावर आहे. इतर ठिकाणात सिद्धिविनायक मंदिर, गेट वे ऑफ इंडिया हे लोकप्रिय आहेत. त्यानंतर मुंबईतील जुहू बीच, महालक्ष्मी मंदिर, हाजी अली, जहांगीर आर्ट गॅलरी, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम व मलबार हिल यांचा समावेश आहे.एलिफंटा गुंफांत काय बदल होतील?एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, एलिफंटा गुंफाचा समावेश केंद्रीय अर्थसंकल्पात पर्यटन सुविधांसाठी करण्यात आल्याने तेथील स्थिती सुधारणार आहे, त्या ठिकाणी जाण्यास वाहतुकीच्या चांगल्या सोयी होतील, जेटीमध्ये सुधारणा होतील. एलिफंटा गुंफाच्या ठिकाणी हेलिपॅडही उभारले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पर्यटकांचा वेळ वाचणार आहे. गेट वे ऑफ इंडियापासून या बेटाकडे जाता येते. एलिफंटा गुंफा भागात वीज नाही. त्यामुळे तेथे विद्युतीकरणाला प्राधान्य मिळेल. गुंफाभोवती वर्तुळाकार मार्ग करण्याचाही विचार आहे. या सर्व सुविधांचा खर्च अजून ठरलेला नाही.एलिफंटा गुंफा या पाचव्या व आठव्या शतकातील असून त्या गेटवे ऑफ इंडियापासून ९ नाविक मैल दूर आहेत. जेटीपासून तेथे जाण्यासाठी मिनीट्रेन असली तरी गुंफांमधील अंतर जास्त आहे, तिथे जाऊन या गुंफा बघण्यास पाच ते सहा तास लागतात. त्यामुळे तेथे पर्यटक मोठय़ा प्रमाणात जाऊ शकत नाहीत, सध्या गेटवे ऑफ इंडिया पाहणारे २५ टक्के लोकच एलिफंटा गुंफांकडे जातात असा अंदाज आहे. हे प्रमाण वाढणे अपेक्षित आहे.