सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी त्यांचे पती व काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे यांचे जाबजबाब सुरू झाले असून त्यांनी आज दक्षिण दिल्लीतील वसंत विहार संकुलातील पोलिस स्थानकात हजेरी लावली. आज दुपारी ते तिरूअनंतपुरम येथून दिल्लीत आले.  पुष्कर यांचा एक वर्षांपूर्वी दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलात खून झाला होता व आता शशी थरूर यांना नोटीस देण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सांगितले.
पोलीस प्रमुखांनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्वाचे जाबजबाब विशेष चौकशी पथक घेत आहे. थरूर यांचे जाबजबाब केव्हा घेण्यात येतील व त्यांना नोटीस दिली आहे काय, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, त्यांना नोटीस देण्यात आली असून केव्हाही जाबजबाब घेण्यात येतील. थरूर हे दुपारी दिल्लीत आले असून त्यांनी प्रश्नांना उत्तरे देण्यास नकार दिला. चौकशी पूर्ण करणे हा आमचा उद्देश आहे व विशेष चौकशी पथक त्यांचे जाबजबाब घेईल असे त्यांनी सांगितले.
त्यांचे जाबजबाब घरी घेतले जातील की अन्यत्र घेतले जातील असे विचारले असता ते म्हणाले की, विशेष चौकशी पथक जेव्हा योग्य वाटेल तेव्हा त्यांची चौकशी करील. अनेकदा त्यांचे जाबजबाब होऊ शकतात का असे विचारले असता बस्सी म्हणाले की, या क्षणाला आपण काही सांगू शकत नाही. जाबजबाब काही मिनिटांचे असतील किंवा जास्त काळाचे असतील.
त्यावेळी माहिती व प्रसारण मंत्री असलेले मनीष तिवारी हे तिरूअनंतपुरम-दिल्ली विमानात १५ जानेवारीला होते व त्याचवेळी शशी थरूर व सुनंदा पुष्कर त्या विमानात होते त्यांच्यातील भांडण तिवारी यांनी पाहिले होते त्यांचे जबाब घेणार का असे विचारले असता त्यांनी सांगितले की, तशी शक्यता नाकारता येत नाही.