यंदाच्या वर्षीही देशात आंबे महाग असणार आहेत, एकूणच आंब्याचे उत्पादन २० टक्क्य़ांनी कमी होणार आहे, कारण अनेक राज्यात गेल्या महिन्यातील बेमोसमी पावसाने आंब्याचे बरेच नुकसान झाल्याचे अ‍ॅसोचेमने म्हटले आहे.
संयुक्त अरब अमिरात, इंग्लंड, सौदी अरेबिया, कतार, कुवेत, बांगलादेश व इतर देशात आंब्याची निर्यात होणार असून त्यामुळेही उन्हाळ्यात आंब्याच्या उपलब्धतेवर ताण येऊन देशी ग्राहकांना भाववाढीस तोंड द्यावे लागेल.
अ‍ॅसोचेमचे महासचिव डी.एस. रावत यांनी सांगितले की, गेल्यावर्षी १८ दशलक्ष मेट्रिक टन इतके आंब्याचे उत्पादन झाले होते, या वेळी निर्यातही कमी राहील. मार्चमधील बेमोसमी पावसाने आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या राज्यात आंब्याच्या ५० टक्के झाडांना फटका बसला आहे. त्यामुळे या पाच राज्यांवरच बरेच काही अवलंबून आहे.  गेल्या तीन वर्षांत आंब्याची निर्यात वाढली असून ती २०१२-१३ मध्ये २६७ कोटी रू. होती ती २०१०-११ मध्ये १६४ कोटी रू. होती.
संयुक्त अरब अमिरातीत भारतातून सर्वात जास्त ६१ टक्के आंबा जातो, त्याखालोखाल इंग्लंड, सौदी अरेबियात आंब्याची निर्यात होते. आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या दोन राज्यात भारतातील निम्मे आंबा उत्पादन होते.