येत्या २७ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी या यंत्रणेचे उद्घाटन करणार असून त्यात प्रवाशांना एकसमान दराने टोल आकारला जाईल त्यात कुठलेही घोटाळे होणार नाहीत. ५५ ठिकाणी टोल प्लाझा तयार करण्यात आले असून ते सेंट्रल क्लिअरिंग सिस्टीमशी जोडले आहेत. हा पथदर्शक प्रकल्प मुंबईतील चारोटी ते अहमदाबाद दरम्यानच्या १० टोल नाक्यांवर राबवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
ईटीसी लेन
केंद्र सरकारने ईटीसी लेन तयार करणे अनिवार्य केले असून त्यामुळे ही यंत्रणा राबवणे सोपे होणार आहे. ईटीसीसाठी नवी कंपनी स्थापन केली असून त्यात राष्ट्रीय महामार्ग विकास मार्ग प्राधिकरणाचा २५ टक्के तर इतर लाभधारकांचा ५० टक्के तर आर्थिक संस्थांचा २५ टक्के समभाग वाटा असेल.
नवीन कंपनीचे नाव इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड असे आहे. यात कॉल सेंटरची सुविधाही दिली जाणार आहे. व्यावसायिक, प्रशासकीय, कायदेशीरदृष्टया हा प्रकल्प सक्षम केला जाईल. त्यासाठी केंद्रीय मोटर वाहन कायदा १९८९ मध्ये बदल करण्यात आले आहेत व प्रत्येक वाहनावर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग लावला जाईल. सध्या टोलचे दर एकसमान नसल्याने अनेक गोंधळ होत आहेत.
पारदर्शकता
या यंत्रणेमुळे टोलवसुली व्यवस्थेत पारदर्शकता येईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.