काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात सांगितली आहे. काश्मीरमध्ये हिंसाचारात तरुण असो किंवा जवान या पैकी कोणाचाही बळी गेल्यास संपूर्ण देशाचेच नुकसान होते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. काश्मीर प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली असून एकता आणि ममता हाच आमचा मूलमंत्र आहे असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बातद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. रिओ ऑलिम्पिकपासून ते काश्मीरपर्यंतच्या विषयावर मोदींनी भाष्य केले. रिओ ऑलिम्पिकमुळे भारताला पदक मिळाले. देशातल्या मुलींनी त्या कोणत्याच क्षेत्रात मागे राहणार नाही हे सिद्ध केले असे सांगत मोदींनी ऑलिम्पिकवीरांचे कौतुक केले. पी गोपीचंद यांच्याविषयी मोदी म्हणाले, आईसोबत जीवनात शिक्षकांचे स्थान महत्त्वाचे असते. खेळाप्रति गोपीचंद यांनी दाखवलेली श्रद्धा आणि त्यासाठी घेतलेल्या मेहनतीला मी सलाम करतो असेही मोदी म्हणालेत. क्रीडा क्षेत्रात भारताला आणखी पल्ला गाठायचा आहे असेही त्यांनी नमूद केले. काश्मीरमधील हिंसाचारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवरही निशाणा साधला आहे. काश्मीरमधील तरुणांना जी लोकं हातात दगड घेण्यासाठी उचकवत आहेत त्यांना एक दिवस उत्तर द्यावे लागेल असे मोदींनी म्हटले आहे. शेजारी राष्ट्रांसोबत मैत्रीपूर्ण संबंध राहावेत याकडे आमचा कल असतो असे त्यांनी आवर्जून सांगितले. सध्या गणेशोत्सव आणि दुर्गापूजाची तयारी सुरु आहे. या उत्सवात आपण मातीच्या मुर्त्यांचा वापर करुन पर्यावरणाचे रक्षण करावे असे आवाहन मोदींनी केले. मदर तेरेसा यांच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. तेरेसा यांनी गरीबांसाठी आपले आयुष्य अर्पण केले होते अशी आठवण त्यांनी सांगितली.