समाधानकारक पावसानंतर देशभरात एक कोटी हेक्टरवर पिकांची लागवड गुजरात, ओडिशा आणि केरळ या तीन राज्यांचा अपवाद वगळता अन्य राज्यांत झालेल्या दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. आतापर्यंत देशभरात सुमारे एक कोटी हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून त्यात सर्वाधिक वाटा डाळी, तेलबिया आणि भाताचा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत निम्म्याच क्षेत्रावर लागवड झाली होती. यंदाचा मोसमी पाऊस समाधानकारक झाल्याने लागवड मोठय़ा प्रमाणात झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने राज्यांकडून गोळा केलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी संपलेल्या आठवडय़ात देशभरात सहा कोटी ९२ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. त्यानंतर एकाच आठवडय़ात म्हणजे, २९ जुलैअखेर लागवडीचे क्षेत्र सात कोटी ९९ लाख ५१ हजार हेक्टरवर पोहोचले आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र भाताचे वाढले आहे. भाताची लागवड तब्बल दोन कोटी ३१लाख हेक्टरवर पोहोचली आहे. त्यानंतर डाळींचा क्रमांक लागतो. गेल्या आठवडय़ातील ९० लाख हेक्टरमध्ये या आठवडय़ात आणखी २० लाख हेक्टरची भर पडली आहे. डाळींच्या गगनाला भिडलेल्या किमतीने चिंतित असलेल्या राज्य सरकारांना त्यामुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तेलबियांची एक कोटी ६० लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. पावसाने सरासरी गाठली यंदा सरासरीएवढा तरी पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. २९ जुलच्या आकडेवारीनुसार, देशाची प्रदीर्घ सरासरी ४३६.९ मिमी असताना आतापर्यंत देशभर ४३४.८ मिमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २१ टक्के जास्त पाऊस झाला आहे. सर्वाधिक चांगला पाऊस मध्य प्रदेश (३८ टक्के अधिक), तमिळनाडू (३५ टक्के अधिक) आणि आंध्रात (३० टक्के जास्त) झाला आहे. २९ पैकी २१ राज्यांत सरासरीच्या आसपास पाऊस झाला आहे.