काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत महागाईवरून सरकारवर केलेले सर्व आरोप अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेटाळून लावले. राहुल गांधी हे आकडे बघायच्या आधीच आरोप करत आहेत, त्यामुळे त्यांनी केलेल्या एकाही आरोपांशी मी सहमत नाही, असे उत्तर जेटली यांनी दिले. उलट यूपीए सरकारच्या काळात धोरणातील कमतरतेमुळे देशातील महागाई वाढली, असा टोला देखील राहुल गांधी यांना जेटलींना लगावला. डाळींच्या किंमती या मागणी आणि पुरवठा यावर ठरत असतात. भारतातच काय पण जगभरात डाळींच्या किंमतीचा तुटवडा आहे त्यामुळे डाळीची किंमत नियंत्रणात आणण्यासाठी सरकार करार करणार असल्याची माहिती त्यांनी लोकसभेत दिली. देशातील डाळींच्या किंमत वाढल्या असून, सरकार महागाईबद्दल काहीच करत नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. तसेच देशातल्या भाज्यांच्या वाढत्या किंमतीवरूनही राहुल यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यावेळी पावसाळ्यामुळे भाज्यांच्या किंमती वाढल्या असल्याचे जेटलींनी स्पष्ट केले. कांद्याच्या किंमती या इतक्या कमी झाल्यात की शेतकऱ्यांना कांदा फेकावा लागला तर गेल्या काही महिन्यांपासून साखरेचे भावही स्थिर आहेत, असे सांगत राहुल गांधी यांचे सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. देशातील महागाई कमी करण्यासाठी सरकारने योग्य पावले उचली असून, देशाची अर्थव्यवस्थाही वेगाने प्रगती करत आहे, असेही जेटली म्हणाले.