मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील हराई नगर येथे रेशनच्या दुकानाला लागलेल्या आगीमध्ये १४ जण होरपळून मृत्यूमुखी पडले आहेत. सायंकाळी ५ च्या सुमारास केरोसीन वाटप होत असताना ही घटना घडली. या घटनेमध्ये १४ जण मृत्यूमुखी तर अनेक जण जखमी झाले आहेत.

कृषिमंत्री गौरी शंकर बिसेन यांनी मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे तर जखमींना २ लाख रुपये जाहीर केले आहेत. जखमींना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल तसेच त्यांच्यावर सर्वोत्तम उपचार केले जातील असे बिसेन यांनी म्हटले आहे. आग लागल्यानंतर दीड तासांनी घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. हराई नगर हे ठिकाण छिंदवाडापासून ८० किमी दूर आहे.