काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्य़ात लागोपाठ दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले असून दोन सुरक्षा जवान धारातीर्थी पडले आहेत. दोन दिवसांपासून ही चकमक सुरू आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुपवाडा जिल्ह्य़ात चौकीबाल येथे चकमक झाली त्यात पाच दहशतवादी ठार झाले.
दोन जवान या चकमकीत धारातीर्थी पडले असून काल सायंकाळी दहशतवादी एका घरात लपल्याची माहिती सुरक्षा दलांना समजली होती. त्यानंतर कारवाई करण्यात आली असता दहशतवाद्यांनीही गोळीबार केला.काल या चकमकीत दोन जवान जखमी झाले होते. सुरक्षा दले व दहशतवादी यांच्यात परस्परांवर गोळीबार झाला. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही चकमक संपलेली नसून सुरक्षा दलांची मोहीम सुरूच आहे.