संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या उत्तर प्रदेशमधील दादरी येथील हत्याकांड प्रकरणातील पीडित मोहम्मद अखलाखच्या घरात गोमांसच असल्याचा अहवाल मथुरा येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिला आहे. यापूर्वी स्थानिक पोलिसांनी त्याच्या घरात सापडलेले मांस बकऱ्याचे असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे केंद्रातील भाजपप्रणीत सरकार या प्रकरणी राजकारण करत असल्याचा नव्याने आरोप होत आहे.

उत्तर प्रदेशमधील दादरी गावात मोहम्मद अखलाख यांच्या घरात गोमांस साठवून ठेवले आहे आणि शिजवले जात आहे असे २८ सप्टेंबरला स्थानिक मंदिरातील ध्वनिक्षेपकावरून जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर १०० ते २०० गावकऱ्यांचा जमाव त्याच्या घराजवळ गोळा झाला.

संतप्त जमावाने अखलाखला घरातून बाहेर खेचून दगड-विटांनी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा दानिश याच्या कवटीला गंभीर इजा पोहोचली होती. या प्रकरणावरून देशात असहिष्णुतेसंदर्भात मोठे वादंग माजले होते.

स्थानिक गौतम बुद्ध नगर पोलिसांनी अखलाखच्या घरातील फ्रिजमध्ये सापडलेले मांस बोकडाचे होते असा अहवाल दिला होता.

आता मथुरा येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेने ते मांस गोवंशाचे असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशय बळावला आहे. अखलाखचा भाऊ चांद मोहम्मद याने म्हटले आहे की, ‘स्थानिक पोलिसांनी प्रथम ते मटण असल्याचे म्हटले. आता ८ महिन्यांनी ते गोमांस असल्याचा अहवाल येत आहे. हे सगळे राजकारण आहे.’ अखलाखची मुलगी साजिदा हिने पहिल्यापासून ते गोमांस नव्हे, तर मटण असल्याचे म्हटले आहे.