जागतिक तापमानवाढीमुळे भारतातील कोलकातासारख्या शहरांमध्ये उष्णतेची प्राणघातक लाट निर्माण होत असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. २०१५ मध्ये कोलकाता शहरात दोन हजार नागरिकांना जीव गमवावा लागला असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. पॅरिस कराराचे पालन न केल्यास जागतिक तापमानवाढ होतच राहणार असल्याचा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे. २०१५च्या पॅरिस कराराला पाठिंबा देणाऱ्या देशांनी या करारानुसार तापमानवाढ रोखण्यासाठी काटेकोर राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, दोन डिग्री सेल्सिअस तापमान कमी करण्याचे आश्वासन या राष्ट्रांनी दिले होते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता तापमान मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याचे संशोधकांनी सांगितले.जगभरातील १०१पैकी ४४ सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये उष्णतेची लाट पसरली असून येथील तापमानात १.५ डिग्री सेल्सिअस इतकी वाढ झाल्याचे संशोधकांनी सांगितले. लोकसंख्यावाढ कायम राहिल्यास २०५०पर्यंत ३५० दशलक्ष लोकांना उष्णतेचा फटका बसणार असल्याचे संशोधकांनी सांगितले. लिव्हरपूल जॉन मूर्स विद्यापीठातील हवामानतज्ज्ञ टॉम मॅथ्यू यांनी तापमानवाढ कायम राहणार असून त्याचा फटका भविष्यात अनेक शहरांना बसणार असल्याचे सांगितले. संशोधकांनी तारखेनुसार दिवसांच्या तापमानाचा अभ्यास केला असून त्यामुळे सध्याची आकडेवारी पाहता तापमानात दिवसेंदिवस वाढच होत जाणार असल्याचे मॅथ्यू म्हणाले. भारतातील कोलकाता आणि पाकिस्तानमधील कराची या शहरांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचेही ते म्हणाले. उष्णतेमुळे २०१५ या वर्षी पाकिस्तानमध्ये १२०० तर भारतात २००० जणांचा प्राण गेल्याचे संशोधकांनी सांगितले.