देशातील १०० स्मार्ट शहरे वसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं स्मार्ट शहर योजना हाती घेतली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत केंद्र सरकार आता ३० शहरांचा विकास करणार आहे. या शहरांच्या नावांची घोषणा नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज, शुक्रवारी केली आहे. स्मार्ट शहर योजनेतील अखेरची यादी जाहीर केली असून, यात महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवडचा समावेश आहे.  याआधी पहिल्या टप्प्यातील २० शहरांची घोषणा केली होती. त्यात भुवनेश्वरला अव्वल स्थान देण्यात आलं होतं. तर तिसऱ्या टप्प्यात जाहीर केलेल्या या यादीत पहिल्या पाचमध्ये अमरावतीला स्थान देण्यात आलं आहे, हे विशेष.

स्मार्ट शहरांच्या योजनेंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील यादीत ३० शहरांची निवड करण्यात आली आहे. नगरविकास मंत्री नायडू यांनी यासंदर्भातील घोषणा केली. तिसऱ्या टप्प्यातील अखेरच्या यादीत तिरुवअनंतपुरम पहिल्या, तर आंध्रप्रदेशातील अमरावती चौथ्या स्थानावर आहे. तर पिंपरी – चिंचवड १८ व्या स्थानी आहे. नवा रायपूर आणि राजकोट अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. बिहारमधील पाटणा पाचव्या स्थानी आहे. जम्मू आणि श्रीनगर ही दोन शहरेही स्मार्ट शहर योजनेंतर्गत विकासित करण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, अलीगढ आणि झाशी या शहरांचीही निवड करण्यात आली आहे. स्मार्ट शहर योजनेत देहरादून आणि शिमला या शहरांचाही विकास केला जाणार आहे. तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या रायबरेली शहराला या यादीत स्थान देण्यात आलं नाही. तर दिल्लीलगत असलेल्या मेरठचाही या यादीत समावेश केलेला नाही.

ही शहरे विकसित करणार

तिरुवअनंतपुरम, नवा रायपूर, राजकोट, अमरावती(आंध्रप्रदेश),पाटणा, करीमनगर, मुजफ्फपूर, पुद्दूचेरी, गांधीनगर, श्रीनगर, सागर, कर्नाल, सतना, बेंगळुरु, शिमला, त्रिपूर, पिंपरी-चिंचवड, बिलासपूर, पासिघाट, जम्मू, दाहोद, तिरुनेलवेल्ली, थूठकुडी, तिरूचिरापल्ली, झाशी, आयझॉल, अलाहाबाद, अलीगढ आणि गंगटोक.