‘कबाली’ चित्रपटामुळे त्याच्याशी निगडीत अनेक चर्चांना दर दिवसाआड उधाण येत आहे. अभिनेता रजनीकांत यांची चर्चा नेहमीच सिनेरसिकांमध्ये होत असते. रजनीकांतच्या चित्रपटापासून त्यांच्या बोलण्याचालण्याच्या हटके अंदाजामुळे ते नेहमीच कुतुहलाचा विषय ठरतात. सध्या सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘कबाली’ चित्रपटाचीच सर्वत्र चर्चा असताना विधानसभेतही या ‘कबाली’ची हवा पोहोचली आहे असेच म्हणावे लागेल. रजनीकांत यांची हिंदी चित्रपट सृष्टीतील वाटचाल प्रामुख्याने दुसरा वा तिसरा नायक अशीच राहिली असली तरीही तमिळ चित्रपटांना त्यांचे व्यक्तिमत्व व शैलीचा सुरेख मेळ साधत महाराष्ट्रातील हा मराठमोळा शिवाजीराव गायकवाड ते सुपरस्टार रजनीकांत हा त्यांनी घेतलेली आश्चर्यकारक झेपच म्हणावी लागेल.
विधानसभेमध्ये मंगळवारी आमदार अनिल गोटे यांनी सुपरस्टार रजनीकांत यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची मागणी केली. औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत त्यांनी ही मागणी केली. अभिनेता रजनीकांत मूळचा कोल्हापूरचा, पण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर आपला वचक ठेवत, तितकेच सामाजिक भान जपत आणि गरजूंना नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या रजनीकांत यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी अनिल गोटे यांनी विधानसभेत केली. त्यामुळे रजनीकांत यांना राज्यातील सर्वोच्च असा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ देण्याबद्दल केलेल्या मागणीवर आता काही हालचाल होणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.