गुजरातमधील कुपोषणाची स्थिती सोमालियापेक्षा वाईट आहे, अशा शब्दांत प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष मरकडेय काटजू यांनी तेथील नरेंद्र मोदी सरकारचा बुरखा फाडला. त्याउलट त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलेल्या कार्याची मात्र प्रशंसा केली आहे.
गुजरातची प्रगती कुचकामी आहे, कारण तेथील सरकार सामान्य लोकांना मदत करू शकलेले नाही. मोदी यांच्या काळात २००२ मध्ये गुजरातमध्ये जे जातीय दंगे झाले त्याचा डाग कशानेही पुसला जाणार नाही असे काटजू पत्रकार परिषदेत म्हणाले.
गुजरातने विकासाबाबत मोठे दावे केले असले तरी सामान्य लोकांचे राहणीमान फार बदललेले नाही, असेही त्यांनी सांगितले.
मोदी यांनी लागोपाठ तिसऱ्यांदा निवडणूक जिंकल्याबाबत प्रतिक्रया विचारली असता ते म्हणाले, की निवडणुका कशा लढवल्या व जिंकल्या जातात हे सर्वानाच माहीत आहे.
ते म्हणाले, की मध्य प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर कुठलाही डाग नाही. कालांतराने गुजरातच्या लोकांना हे लक्षात येईल, मोदी ज्या विकासाच्या गोष्टी करीत आहेत त्याचा आपल्याला काही फायदा नाही.
शिवराजसिंह चौहान यांना आपण मुशायऱ्याच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते तेव्हा त्यांनी पंधरा मिनिटांसाठी येण्याचे आश्वासन दिले व पन्नास मिनिटे त्यांनी मुशायरा ऐकला. चौहान हे नम्र व निगर्वी आहेत. मध्य प्रदेशात उर्दू भाषेच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे असे काटजू यांनी सांगितले.