भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याऐवजी सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पंतप्रधान असते तर येथील लोकशाही व्यवस्था कोसळून भारताचा पाकिस्तान झाला असता विधान दलित कार्यकर्ते व लेखक कांचा इलैय्या यांनी केले आहे. नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

इलैय्या म्हणाले की, सरदार पटेल हे देशाचे पहिले पंतप्रधान असते तर देशाचा प्रवास वेगळ्या पद्धतीने झाला असता असे नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारावेळी म्हटले होते. पण पटेल यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना देशाची घटना लिहूच दिली नसती कारण पटेल यांची हिंदू महासभेशी जवळीक होती. पटेल पंतप्रधान असते तर भारताची राज्यघटना मनुस्मृतीच्या समर्थकांनी लिहीली असती आणि काही वर्षांतच भारताचा पाकिस्तान झाला असता.

दरम्यान या कार्यक्रमात भाजपचे माजी नेते सुधींद्र कुलकर्णी देखील उपस्थित होते. त्यांनीही इलैय्या यांच्या विधानाचे समर्थन केले. सध्या देशासमोरील आव्हानांवर मार्ग करण्यासाठी पटेल यांचा विचारांचा काहीच उपयोग नाही. आपल्याला पोलादी पुरूषाची गरज नसून सर्वसमावेशक दृष्टीकोन असलेल्या सहृदयी नेत्याची या देशास आवश्यकता आहे, असे सुधींद्र कुलकर्णी यावेळी म्हणाले.