गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये भीषण अशी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे आतापर्यंत राज्यातील २५३ जणांचा बळी गेला आहे. बिहारमधील तब्बल सव्वाकोटी लोकसंख्या एकटवलेल्या २० जिल्ह्यांना या पुराचा मोठा फटका बसला आहे. या संपूर्ण परिसरात काल सर्वाधिक ५१ लोकांचा मृत्यू झाला. यापैकी अररिया जिल्ह्यात सर्वाधिक भीषण पूर परिस्थिती आहे. बिहारच्या सीमावर्ती भागात आणि नेपाळमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील बहुतेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे किनारी भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून बचावकार्य जोरात सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पूराचा वेढा पडलेल्या गावांमधून तब्बल ४.६४ लाख लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. तसेच या पूरग्रस्तांच्या सोयीसाठी १,२८९ मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी तब्बल ३.९२ कोटी लोकांनी आसरा घेतला आहे. देशातील अन्य राज्यांमध्येही काही प्रमाणात अशी पूर परिस्थिती पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुरामुळे आणखी बळी गेल्याने आतापर्यंत पुराने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६९ वर गेली आहे. राज्याच्या २४ जिल्ह्य़ांमधील २० लाखांहून अधिक लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. राज्यातील पूरबळींची संख्या ६९वर पोहोचली आहे. २४ जिल्ह्य़ांतील २५२३ खेडय़ांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने २० लाखांहून अधिक लोकांना फटका बसला आहे, असे शनिवापर्यंत गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीच्या आधारे बचाव आयुक्तांच्या कार्यालयाने सांगितले. नेपाळमधून उगम पावणाऱ्या नद्यांचे पाणी वाढत असून त्याने पूर्व उत्तर प्रदेशातील फार मोठय़ा भागात थैमान घातले आहे. याचा फटका बसलेल्या जिल्ह्य़ांमध्ये सुमारे ४० हजार लोकांनी मदत शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे. २ लष्करी हेलिकॉप्टर्स, एनडीआरएफच्या २० कंपन्या आणि पीएसीच्या (पूरविषयक) २९ कंपन्यांचे जवान यांच्यासह लष्कराचे जवान पुराचा तडाखा बसलेल्या भागात अडकलेले लोक आणि मालमत्ता यांचे रक्षण करण्याच्या कामात गुंतलेले आहेत. नेपाळमधून निघणाऱ्या नद्यांमध्ये सोडण्यात आलेले पाणी आणि मुसळधार पाऊस यामुळे बचावकार्य तसेच लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या कामात अडथळा येत आहे, असे प्रशासनाने सांगितले. तर आसामलाही पुराचा मोठा तडाखा बसला आहे. आसाममध्ये पुराने रौद्ररुप धारण केले आहे. पुरामुळे काझीरंगा अभयारण्यातील २२५ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. ‘काझीरंगा’मधील ३० टक्के परिसर पुराच्या पाण्याखाली गेला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पुरात काझीरंगाचा ७० टक्के परिसर पाण्याखाली गेला होता. त्यात १०५ प्राण्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती अभयारण्याचे संचालक सत्येंद्र सिंह यांनी ‘आयएएनएस’ला दिली. पुराचे पाणी ओसरू लागले आहे. येथील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील, असेही त्यांनी सांगितले. मृत प्राण्यांमध्ये १७८ हरिण, १५ गेंडे, चार हत्ती आणि एका वाघाचा समावेश आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या पुरातून येथील जनजीवन पूर्वपदावर येत नाही तोच पुन्हा पुराने तडाखा दिला. राज्यातील २५ जिल्ह्यांतील ३३ लाख नागरिकांना या पुराचा तडाखा बसला. मुसळधार पावसामुळे येथील घरे, सरकारी इमारतींचे नुकसान झाले आहे. तर रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पूल वाहून गेले आहेत. रेल्वे सेवा ठप्प झाल्याने ईशान्येकडील राज्यांचा देशातील इतर भागाशी संपर्क तुटला आहे. २०१२ मध्येही काझीरंगाला पुराचा तडाखा बसला होता. त्यात ७९३ प्राण्यांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षीही पुरामुळे ५०३ प्राण्यांचा मृत्यू झाला होता.