नेपाळसह भारतात झालेल्या भीषण भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना सोमवारी लोकसभेत श्रध्दांजली वाहण्यात आली. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सभागृहाच्या वतीने श्रध्दांजली वाहिली आणि त्यानंतर संपूर्ण सभागृहाने काही काळ मौन पाळले. नेपाळच्या भूकंपाविषयी केंद्र सरकार निवेदन देणार असून दुपारी संसदेत माहिती देणार असल्याचंही महाजन यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, मुलायम सिंग यादव यांनीही सर्व खासदारांनी आपल्या वेतनातील काही भाग नेपाळ भूकंपग्रस्तांना द्यावा अशी विनंती केली.  
भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या नेपाळला भारत सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात दिले होते. नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक भारतीयास मायदेशी सुखरूप आणण्यासोबतच केंद्र सरकारने स्थानिक नागरिकांच्या बचावासाठी मोठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे.